अचला कब्बुर, वेदिका कुमारस्वामी, संघमित्रा काळे, निकिता मोने, शगुफ्ता, स्वरूपा रावल, माया अकोटकर, चिन्नाक्का, प्रेमला, गुलाब, चंद्रिका, शांता यांच्या कविता गेल्या काही महिन्यांत मी प्रथम फेसबुकवरून वाचकांसमोर ठेवल्या. या नावांमध्ये पुढील काळात अजून काही नावांची भर पडणार आहे. यात मूळ कविता आणि अनुवादित कविता असे दोन्ही प्रकार आहेत. अनुवाद केवळ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत, असा नेहमीसारखा सहज नव्हता; कारण हे बरंचसं लेखन मिश्र भाषांमध्ये, किमान चार ते पाच भाषांची सरमिसळ होत झालेलं होतं. त्यामुळे अनुवाद करताना देखील मूळ कवयित्री, दुसऱ्या भाषा जाणणारी अजून एखाददुसरी व्यक्ती यांना सोबत घेऊन केला. दोन भाषा आणि अनुवाद ही पारंपरिक चौकट यातून नकळत मोडली गेली होती. समूहाने लेखन, अनुवाद अशी कामं करता येऊ शकतात हे चळवळींची गीतं रचणाऱ्या लोकांना माहीत असतं; साहित्यिकांना कदाचित ते आक्षेपार्ह वा दुय्यम दर्जाचं वाटू शकतं. अशी मतं असणाऱ्या लोकांसाठी हे नाहीये.
मूळ कवितांवरही मी आशयाला धक्का लागू न देता संपादकीय संस्कार केले. ‘समवाय’ नावाचा एक ब्लॉगदेखील या कविता वाचकांना एकत्र वाचता याव्यात म्हणून मी तयार केला. ( अवांतर : असाच दुसरा ब्लॉग आदिवासी साहित्य / लोकसाहित्य / संस्कृती याविषयीचा देखील केलेला आहे आणि तिसरा माझ्या स्वतंत्र लेखनाचा ब्लॉग आधीपासून आहेच. ) ही नावं वाचकांना अपरिचित वाटल्याने ‘या कोण?’ अशी उत्सुकताही त्यांच्याविषयी निर्माण झाली आणि कवितांवर ( खेरीज या कवितांच्या निमित्ताने काही साहित्यबाह्य मुद्द्यांवर देखील ) बऱ्यापैकी चर्चा सुरू झाली.
कविता लिहिणं आणि आवडलेल्या कवितांचे अनुवाद करणं हे मी गेली तीस-बत्तीस वर्षं सातत्याने करत आले आहे. पुढे संपादनाची कामं करू लागल्यावर अनेक कवितासंग्रहांची संपादनंही केलेली आहेत. ‘भारतीय लेखिका’ या प्रकल्पात विविध भारतीय भाषांमधल्या लेखिकांचा शोध घेतला, अनुवाद निवडले, निवडक पुस्तकांचे अनुवाद करून घेतले. स्वत:च्या लेखनासोबत अनुवाद व संपादन ही कामं आपली समज वाढवणारी ठरतात, हा त्यामागचा एक स्वार्थ. दुसरं म्हणजे चांगलं समकालीन लेखन वाचकांना उपलब्ध होतं आणि वाचकांच्या जाणिवाही त्यातून समृद्ध होऊ शकतात. माझे हेतू हे इतके साधे आणि स्वच्छ आहेत. प्रसिद्धी, पुरस्कार व पैसा हे तीन ‘अवांतर’ व ‘गैर’ हेतू आहेत, असंही काही लोकांना वाटतं; मात्र यातून ‘किती’ मिळतं हे वास्तव त्यांना ठाऊक नसतं, इतकाच याचा अर्थ. अशा लोकांकडे मी आता ठरवून दुर्लक्ष करायला शिकले आहे.
लिहिण्याखेरीजचं माझं दुसरं काम सामाजिक. आता प्रकृतीमुळे फिल्डवर्क पूर्ण बंद झालं असलं तरी टेबलवर्क सुरू असतंच. सामाजिक चळवळी आणि स्वयंसेवी संस्था यांच्यात कामं करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी गेली अनेक वर्षं मी लेखन शिबिरं घेतेय. डायऱ्या कशा लिहाव्यात, अहवाल कसे लिहावेत इथपासून ते कुणाला क्रिएटीव्ह लेखन करण्याबाबत काही प्रश्न मनात असतील तर त्यांचीही चर्चा या शिबिरांत होते. नमुना लेखन करवून घेतलं जातं. हिंदीतलं असं कार्यकर्त्यांनी मिळून लिहिलेलं एक पुस्तक ( आगीशी खेळताना ) मी अनुवादितही केलं आहे. ज्या संस्थांमध्ये पीडितांच्या पुनर्वसनाचं काम होतं, तिथं ‘मानसोपचारा’चा एक भाग म्हणून डायऱ्या, मनोगतं, कविता ‘लिहवून’ घ्यायचं… असेही काही उपक्रम आम्हीच नव्हे, तर इतरही अनेक संस्थांनी वेळोवेळी आखले आहेत. कधी या हकीकती ऐकून, वाचून त्यावर आधारित विविध फॉर्ममध्ये कार्यकर्त्यांनी ‘स्वतंत्र’ लेखनही केलेलं आहे; तर कधी नुसतं शब्दांकन देखील. एड्स झालेल्या एका वेश्येचं ( मृत्यूमुळे ) अधुरं राहिलेलं आत्मचरित्र, बारबालांच्या आत्मकथा, हिजड्यांच्या डायऱ्या, लेस्बियन मुलींच्या डायऱ्या, तुरुंगात असताना कैद्यांनी लिहिलेल्या कविता व एकांकिका असा काही मजकूर मी वाचलेलाही आहे.
वाचकांपर्यंत या गोष्टी कितपत पोहोचतात हे अनेकदा प्रकाशकांवर अवलंबून असतं; खेरीज कविता, नाटक अशा फॉर्मना तुलनेत वाचक कमी असतो. त्यामुळे पूर्वी यातील जे प्रकाशित झालं आहे, ते वाचकांपर्यंत कितपत पोहोचलं आहे याची कल्पना नाही. ‘समवाय’ हा ब्लॉग तयार करण्यामागे ही पार्श्वभूमी होती.
लेखन वाचून समाज बदलतो, असे भाबडेपण आता माझ्यात शिल्लक नाही; तरीही वेगळी जगं लेखनातून खुली झाल्याने वाचकांची संवेदनशीलता, विचार करण्याची पद्धत, दृष्टी काही प्रमाणात का होईना पण बदलू शकते, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे वेगवेगळ्या फॉर्म्समधून वेगवेगळी जगं वाचकांसमोर आणली जावीत, अशी माझी भूमिका आहे. विविध कवयित्रींच्या कविता वाचकांना उपलब्ध करून देणं हा त्यातील एक भाग.
हे दोन्ही मुद्दे ‘मी’चं कौतुक करण्यासाठी सांगितलेले नाहीत. या कवितांवर आणि प्रकाशित करण्याच्या माझ्या हेतूंवर जे आक्षेप घेतले जात आहेत, त्यांना उत्तरं देत बसण्यात वेळ घालवायचा नाही, म्हणून एकदाच जाहीर करून टाकण्यासाठी सांगितलं आहे.
००
कविता म्हणजे स्फुट कविता हा एकच प्रकार सध्या मराठीत प्रामुख्याने लिहिला जात आहे. गझला लिहिणाऱ्या लोकांचे वेगळे गट आहेत, मात्र वर्षानुवर्षे ते एकच दळण दळताहेत; त्यामुळे त्यांचा विशेष विचार करावासा वाटत नाही. मधल्या काळात हायकू आणि चारोळ्या हे प्रकार आले – गेले. अभंग लिहिणारी पिढीही मागे राहिली. नाही म्हणायला दीर्घ कवितांची काही पुस्तकं आली; पण त्यातही दीर्घ कवितेची काही वैशिष्ट्ये असतात याचा विचार न करता केवळ अधिक ओळींची / लांबत गेलेली कविता म्हणजे दीर्घ कविता या ढोबळ धाटणीतून लिहिलेले बरेच दिसते. मालिका कविता देखील आल्या काही, त्याही हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या. पंचवीसहून अधिक कवितांचे प्रकार मराठीत होते; ते इतिहासात जमा झालेले आहेत. बाहेरून आलेल्या प्रकारात सुनीत, रुबाया टिकले नाहीत; गझल आणि हायकू टिकले. लोकगीतांच्या प्रभावातून काहींनी कविता लिहून पाहिल्या; त्याही वाचकांना विशेष भावल्या नाहीत.
त्यामुळे अजून कुणी काही वेगळं लिहितं आहे का, या शोधात असताना लोककथागीत या प्रकाराशी किंचित साधर्म्य दर्शवणारा कथाकविता हा प्रकार मला वेदिकाच्या कवितेतून सापडला.
असाच दुसरा मुद्दा होता लेखनविषयांचा. बहिणाबाई चौधरी यांच्यानंतर शेती व्यवसाय करणारी ( व ते जग कवितेतून मांडणारी ) कल्पना दुधाळ ही कवयित्री मधल्या पिढ्या ओलांडून आज लिहिताना दिसतेय. शेतकरी आंदोलनात स्त्रियांचा सहभाग मोठा होता, मात्र त्यातल्या कुणीच का ‘लिहित्या’ झाल्या नाहीत, हा एक प्रश्न आहेच. मुळातच कवींचे ‘व्यवसाय’ पाहिले, तर बहुतांश लोक शिक्षक-प्राध्यापक आहेत असं ध्यानात येतं. अनुभवांच्या अनेक जगांपासून मराठी कविता वंचित राहिलेली आहे, हे त्यातून जाणवतं.
कविता आणि उत्स्फूर्तता, कविता आणि भावना यांची सांगड कवितेला घातक ठरलेली आहे. विचार, अभ्यास, बैठक मारून लेखन करणं या ‘कविते’साठी करायच्या गोष्टी नसतात, असा एक रूढ पारंपरिक समज आहे. पुनर्लेखन, कवितेचे अनेक खर्डे तयार करणं, अनेक तऱ्हांनी – अनेक विषयांवर ‘लिहून पाहणं’ हे आपल्याकडे कवितेबाबत क्वचितच केलं जातं. अगदी ‘कवितेची कार्यशाळा’ घ्यायची गरज नाही, पण निदान कविता लिहिण्यातल्या अनेक शक्यता कवींपर्यंत आणि वाचकांपर्यंत पोचवण्यास हरकत काय? निदान चर्चा तर सुरू होतील.
शिकवून कविता लिहिता येत नसते, मात्र शिकवून कविता या साहित्य प्रकाराकडे किती पद्धतींनी पाहता येऊ शकतं हे समजू शकतं… यावर माझा विश्वास आहे. बहुतांश वाचकांना कवितेची ‘सवय’च नसते आणि ज्या मजकुराला ते कविता म्हणतात ते पाहता ते अद्याप कित्ते गिरवण्याच्या बाळबोध अवस्थेत आहेत, हे ध्यानात येतं. चांगल्या कविता त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्या का व कशा चांगल्या आहेत हे परिभाषेचा अतिरेक न करता साधेपणी सांगणं आणि यात सातत्य राखणं इतकाच यावर उपाय.
००
या कविता फेसबुक आणि ब्लॉगवर आल्यावर ज्या चर्चा झाल्या, त्यातले काही मुद्दे रोचक होते.
वेदिकेच्या कवितेतून एक कथा उलगडू लागली; तेव्हा ही ‘कविता’ आहे का? – अशी एक चर्चा सुरू झाली. कवितेत कथा असावी का, कवितेत आत्मचरित्र असावे का किंवा कथाकाव्य, चरित्रकाव्य, आत्मचरित्रकाव्य असे प्रकार असतात का? – असेही मुद्दे त्यातून पुढे आले.
दुसरा मुद्दा भाषेचा होता.
वेदिकाच्या कवितेतली विचित्र वाटणारी क्रियापदं, ‘पूर्ण ग्रामीण’ न वाटणारी भाषा, ‘अमुक प्रांतातील ग्रामीण’ असा निश्चित छाप मारता न येणारी भाषा, मधूनच येणारे इंग्लिश व संस्कृत शब्द यामुळे कुणीतरी ‘शहरी’ असलेली व्यक्ती ग्रामीण भाषा येत नसताना ‘चुकून’ हे सरमिसळीच्या भाषेत लिहीत आहे; असा संशय काही ‘अभ्यासकां’च्या मनात निर्माण झाला. विदर्भात असं नसतं, मराठवाड्यात तसं नसतं, खानदेशात अमुक, पश्चिम महाराष्ट्रात तमुक असे दाखले दिले जाऊ लागले. सोलापूरकडची कन्नड-मराठी मिश्र भाषा, कोल्हापूर – बेळगाव कडची कन्नडचा प्रभाव असलेली मराठी यांची उदाहरणे समोर येऊ लागली. काही शब्द, काही ओळी कानडीत असल्याने कर्नाटकाशी संबंधित वाचकांना उत्साहाचं भरतं येऊ लागलं आणि त्या बाबतची माहिती ते पुरवू लागले. फक्त टेबलवर्क करणाऱ्या भाषाभ्यासकांच्या तर्कांचा इथं फज्जा उडाला.
संघमित्राच्या कवितेतली मराठवाडी बोली काही वाचकांना यासाठी आक्षेपार्ह वाटली की, “सुशिक्षित असून बोलीभाषेत का लिहिता? असा गावंढळपणा ‘ठरवून’ करत असाल, तर त्यामागचं कारण काय?”
याच उलट दुसरा आक्षेप वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या कवितांवर होता… “त्यांच्या कवितांमध्ये प्रमाण भाषेतले शब्द कसे काय येऊ शकतात?”
भाषेचं समाजशास्त्र या विषयावर या चर्चांचा विस्ताराने विचार केला तर एक स्वतंत्र लेख होऊ शकेल, असं वाटलं.
ज्यांना मुळाक्षरं गिरवता येतात, सही करता येते, प्राथमिक स्वरुपात ठळक अक्षरांत लिहिलेलं वाचता येतं आणि प्रयत्नपूर्वक थोडं लिहिता येतं – असा वर्ग लिहू लागतो, तेव्हा त्याच्या कवितेची भाषा कशी असेल? स्त्रियांच्या भाषेचा स्वतंत्र अभ्यास आपल्याकडे कुणी केला आहे का? तो स्थळ व जातीनिहाय आहे का? स्त्रियांचा वर्ग व व्यवसाय यांचा त्यात काही विचार झाला आहे का? शब्द आणि म्हणी-वाक् प्रचार यांच्या याद्या नव्हेत; त्यापलीकडे जाऊन रीतसर भाशास्त्रीय पद्धतींनी केलेला अभ्यास! भाषा स्त्रियांनी विकसित केली, जतन केली, जोपासली; परभाषांच्या आक्रमणकाळात तिला माजघरात लपवून तिचं रक्षण त्यांनीच केलं… असं म्हणतात. त्यांची लोकगीतं, ओव्या, व्रतकथा इत्यादी मौखिक साहित्य अनेकांनी संकलित केलं आहे. त्या निमित्ताने थोडा भाषेचा अभ्यासही झालेला दिसतो. त्यापलीकडे दुर्लक्षच.
‘स्त्रिया’ असंच लिहितात, ‘स्त्रियां’नी असंच लिहायचं असतं, ‘स्त्रियां’नी असंच लिहावं इथपासून ते त्यांनी हे लिहू नये, याविषयी लिहू नये, अशा भाषेत लिहू नये, अमुक प्रतिमा वापरू नयेत असे उपदेश अजून किती पिढ्या केले जाणार आहेत? कविता वा कथा वा कादंबरी अशी लिहीत नसतात, क्रियापदं तशी वापरत नसतात, हे शब्द – या प्रतिमा कालबाह्य झालेल्या असल्यामुळे आज त्या वापरणं मागासपणाचं लक्षण आहे… हे अनेकांकडून सांगितलं जातं. उंबरठ्याबाहेरचं जग तुम्हाला ठाऊकच नाही, म्हणताना उंबरठ्याआतल्या जगाचं आपलं भलंमोठं अज्ञान आपण जाहीर करत आहोत, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. एरवी दुनियाभर कितीही उंडारलो तरी या उंबरठ्याआतल्या जगातच पुन:पुन्हा परत यावं लागतं, हे माहीत असूनही ते या जगाला क्षुल्लक लेखतात. उंबरठ्याआतल्या स्वयंपाकघराविषयी लिहिलं तर ते तुच्छ आणि बेडरूमविषयी लिहिलं तर असभ्य हेही त्यांनी ठरवून टाकलं आहे. स्त्रियांना काजवे समजून अशा अनेक लहान-लहान डब्यांमध्ये कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
त्यांचं लेखन चांगलं असेल तर ते त्यांनी स्वत: लिहिलेलंच नाही, असा आरोपही सरसकट होत आलेला आहे. पूर्वी वडील, भाऊ, नवरा यांनी लिहून दिलेलं असेल, असे आरोप होत; आता तिचा बायोडेटा शोधून ती अल्पशिक्षित, अशिक्षित असेल तर ‘अडाणी’ आहे असा निष्कर्ष काढून, एखाद्या प्रस्थापित लेखक-लेखिकेने हे लिहून दिलं असेल असं म्हटलं जातं. ज्यांचं साहित्याचं वाचन व अभ्यास नाही, त्यांना स्वबुद्धीने स्वतंत्र लेखन करता येणं शक्यच नाही; त्यांच्याकडे प्रतिभा कुठून असणार? कल्पनाशक्ती, रचनाकौशल्य कसं असणार? – असे प्रश्न लोक आजही विचारतात. बहिणाबाईंच्या कवितेची चर्चा करताना ‘त्या अशिक्षित असून…’ हे वाक्य आवर्जून येतंच.
हे सारं या सगळ्याजणींच्या कवितांच्या निमित्ताने थेट अनुभवायला मिळालं.
प्रत्यक्षात अशी गृहितकं असणारे लोक भाबडे, अज्ञानी, खुज्या कल्पनांच्या तावडीत सापडलेले आणि मर्यादित व बोथट विचार करणारे असतात. पठारावस्थेतलं साहित्य हेच खरं साहित्य म्हणण्याच्या नादात ते नव्या शिखरांची व नव्या दऱ्याखोऱ्यांची शक्यताच विसरून गेलेले आहेत. नाकारणं, दुर्लक्ष करणं, अलक्षित राहू देणं हे वेगळी नैतिकता मांडणाऱ्या स्त्रीसाहित्याकडे पाहण्याचे त्यांचे रूढ मार्ग आहेत.
प्रत्येक स्त्रीने आयुष्यात किमान एक तरी स्थलांतर अनुभवलेलं असतंच. त्यामुळे स्त्रियांच्या कवितेची भाषा ही स्थलांतरितांची भाषा असते. थोडक्यात सांगायचं तर ती ‘मिश्र’ असते. स्थलांतराचं स्वरूप व कारणं यावरून ही मिश्रता बदलते व कमीअधिक होते. संस्कृती, समाजातलं स्थान, आर्थिक दर्जा, भौगोलिक परिस्थिती इत्यादी अनेक घटकांच्या संदर्भातही भाषिक मिश्रणं होत आणि बदलत राहतात. स्त्रीचं पर्यावरण त्यामुळे वेगळं बनतं. इथं परिचित करून दिलेल्या कवयित्री अनेक स्थलांतरं अनुभवलेल्या अशा वेगळ्या पर्यावरणातल्या कवयित्री आहेत.
००
माणसं कसा विचार करतात? माणसांच्या भावना कशा असतात? माणसं कशी व्यक्त होतात? हेच प्रश्न स्त्री आणि पुरुष हे शब्द माणूस या शब्दाऐवजी वापरून विचारले, तर हमखास वेगळी उत्तरं मिळतात. स्त्रियांची भावना व्यक्त करण्याची एक निश्चित पद्धत असते आणि स्त्रियांच्या कवितेत विचाराला फारसं स्थान नसतं वा असलंच तर ते दुय्यम असतं. असं म्हणताना स्त्रियांचं सरसगटीकरण केलेलं दिसतं. मध्यमवर्गी व मध्यममार्गी स्त्रिया लिहीत होत्या तोवरचा हा विचार पुढच्या तीन पिढ्यांमध्येही अशाच स्त्रियांची संख्या जास्त असल्याने कंटिन्यू झाला. या स्त्रिया विशिष्ट नैतिकतेच्या होत्या, आहेत, असतात, असाव्यात असं मानलं गेलं आणि या स्त्रियांच्या कवितेनेही याच नैतिकतेचा पुरस्कार केला.
अगदी विद्रोहापोटी कुणा कवयित्रीने ‘व्यभिचार आवडतो’ असं लिहिलं आणि तिला आपलं हे विधान नैतिक चौकट मोडणारं, धक्कादायक आणि धाडसी वाटत असलं; तरी ती त्याच नैतिकतेला मानणारी ठरते. अन्यथा ‘व्यभिचार’ ही संकल्पना वा हा शब्द तिच्या लेखनात आलाच नसता. तिच्या दृष्टीने तो एक उचित आचार असता, तर तिने पहिल्या नैतिकतेतल्या संकल्पना वापरल्या नसत्या. असे विचार करण्याचे कष्टच न घेतल्याने विद्रोह मर्यादित व मिळमिळीत बनतात.
भिन्न नीतीच्या स्त्रिया पारंपरिक लोकांना अनैतिक वर्तन व विचार करणाऱ्या वाटू शकतात. जुन्या नीतीच्या चष्म्यातून असे विचार व कल्पना मांडणाऱ्या कवयित्री खोट्या व वरपांगी अनैतिकतेचा आभास निर्माण करणाऱ्या असतात. अस्सल अनीती ही फक्त भिन्ननीती असते.
ज्या कविता मी निवडल्या आहेत, त्यापैकी वेदिकाच्या कवितांचा संग्रह प्रकाशित करण्यासाठी मराठीतल्या काही मोठ्या व मान्यवर प्रकाशन संस्थांनी स्वत:हून रस दाखवला ही गोष्ट मला कवितेच्या जगातली एक स्वागतार्ह गोष्ट वाटली. देवदासी, धार्मिक वेश्या, वेगळ्या नैतिकतांचा आढावा आणि अजून काही मुद्दे घेत एक दीर्घ लेख त्या पुस्तकात कवितांसोबत प्रकाशित केला जाईल. काही महिन्यांत पुस्तक प्रकाशित होईल, त्यामुळे ते तपशील इथं टाळते आहे. मात्र स्त्रियांमधले जात, धर्म, वर्ग भेद या निमित्ताने थेट उलगडण्याचा प्रयत्न करते आहे. दुसरं पुस्तक वेश्यांनी लिहिलेल्या कवितांचं असेल. त्या कवितांसोबतही असाच एक दीर्घ लेख असेल. बाकी कवितांचं कदाचित संकलन करता येईल किंवा त्या ब्लॉगवरच राहतील.
००
‘आपण’ आणि ‘त्या’ असं सरळ सरळ विभाजन समाजात दिसत असलं तरी त्यांच्यातली सीमारेषा धूसर आहे. कुलीन, सभ्य, प्रतिष्ठित, औरस, विवाहबंधन मानणाऱ्या, एकनिष्ठ, पतिव्रता स्त्रिया ‘आपण’ स्त्रियांमध्ये मध्ये आणि कुलटा, चवचाल, बाजारबसव्या, रखेली, रांड, वेश्या, गावनवऱ्या, अखंड सौभाग्यवती, अनौरस, विवाहबंधन न मानणाऱ्या स्त्रिया दुसऱ्या बाजूला ‘त्या, तसल्या’ बायांमध्ये. आपण पहिल्या व त्या दुसऱ्या. सीमारेषा धूसर कशी? एक उदाहरण सांगते. ‘पहिल्या’तल्या स्त्रिया आई, बहीण, पत्नी, मुलगी, सून, मैत्रीण, प्रेयसी, सहकारी इत्यादी कोणत्याही नात्यातली वा ओळखीतली असो; तिला अपमानास्पद, तुच्छतापूर्ण वागणूक देण्यासाठी ‘दुसऱ्या’ स्त्रियांसाठी वापरली जाणारी संबोधनं वापरली जातात. आपल्याला व्यभिचारी, अनैतिक वर्तन करणारी, पापी स्त्री समजलं / संबोधलं जातंय ही कल्पनाही या पहिल्या स्त्रियांना सहन होत नाही. त्या संतापून भांडतात तरी किंवा ओशाळून रडतात तरी. आपलं ‘उच्च स्थान’ यामुळे घसरणीला लागतंय असं त्यांना वाटतं. इथं त्या केवळ पुरुषसत्ताक पद्धतीच्याच नव्हे, तर जात व धर्म या संस्थांच्या देखील बळी ठरतात.
दुसऱ्या बाजूने ‘दुसऱ्या’ स्त्रियांना माहीत आहे की, पहिल्या स्त्रियांहून आपण अनेक अर्थांनी आणि अनेक तऱ्हांनी वेगळ्या आहोत. त्यांचा राग फक्त परिस्थितीवर आणि पुरुषांवरच नसतो, तर या पहिल्या स्त्रियांवर देखील असतो. परिस्थिती अनेकदा हातात नसते, काही पुरुषांनी घृणा दर्शवली तरी असंख्य पुरुष लैंगिक गरज भागवायला त्यांच्याकडेच येतात ही जाणीव त्यांना आहे. मात्र या पहिल्या स्त्रिया देहव्यापारामुळे आपल्याला सर्वांत नीच समजतात, आपली निखळ घृणा करतात, याची खदखद त्यांच्या मनात असते. त्यातून त्या कधी यांच्या सभ्यतेचे बुरखे फाडतात, यांना आपले पुरुष आपल्याजवळच राखता येत नाहीत म्हणून ‘कमी’ लेखून हसतात, गृहिणी विद्रोह-विरोध करत नाही या मजबुरीची टिंगल करतात. काहींना यांच्या आर्थिक सुस्थिती, शिक्षण व प्रतिष्ठा यांचा हेवा वाटतो; तर काहींना आपण यांच्याहून अधिक स्वतंत्र आहोत असा भ्रमही होतो. गृहिणी आणि वेश्या अशा दोन्ही भूमिका समांतर निभावणाऱ्या देखील अनेकजणी आहेत; त्या दोन्ही जगांमधील चांगलं आणि वाईट ओळखून, पचवून तग धरून असतात. मात्र बहुतेकींच्या मनात तिरस्कार, घृणा, मत्सर, संताप या भावना प्रामुख्याने वसतात; प्रेमाला तिथं जागा नाही, वात्सल्याला मात्र निश्चितच आहे… आपली आई+मूल अशा आदिम कुटुंबाची जनुकीय आठवण त्या विसरू शकत नाहीत. या भावनांच्या गलक्यात ‘विचारां’ना स्थान मिळणं फारच अवघड; त्यांचं जगण्यातून आलेलं तत्त्वज्ञान आणि अध्यात्म मात्र त्यांच्या कवितांमधून निश्चित सापडतं… आणि ते पहिल्या स्त्रियांच्या कवितांमधील तत्त्वज्ञान आणि अध्यात्माहून पुष्कळच निराळं आहे.
पहिल्या विभागातल्या काही स्त्रिया अशा आहेत, ज्या राहतात पहिल्यांसोबतच आणि तरी त्यांना ‘दुसऱ्यां’सदृश्य मानलं जातं. बलात्कार झालेल्या स्त्रिया, कुमारीमाता, गरोदर विधवा, विधवा, घटस्फोटिता, अविवाहिता… इत्यादी. त्यांच्या कवितांमधून देखील पहिल्यांच्या जगाचे मुखवटे ओरबाडून फेकलेले दिसतात.
००
या कवितांच्या निमित्ताने साहित्यक्षेत्रातले लोक कवितेचा विचार कसा आणि किती करतात; कवयित्रींविषयी काय बोलतात; त्यांना कवितेहून कवीच्या लिंग-जात-धर्म-वय-वर्ग-व्यवसाय या गोष्टींमध्ये अधिक रस कसा आहे अशा अनेक गोष्टी लक्षात येऊ लागल्या. एकेकाचा दांभिकपणा दिसू लागला आणि मुखवटे उतरू लागले. अलिप्त राहून दूरवरून पाहणे हा दुसरा प्रकारही यावेळी दिसला. कवयित्रींचा अत्तापत्ता शोधण्यासाठी आपण हेर आहोत का, पोलीस आहोत का? – असा प्रश्न कुणालाही पडला नाही. ‘त्या कोण आहेत, कशा दिसतात?’ हे जाणून घेण्याचा आम्हांला वाचक म्हणून हक्क आहे… असे उबगवाणे मुद्दे समोर आले. ‘वेदिकाचा मुखडा दाखवा, तीस लाख देईन…’ अशी खुली ऑफरदेखील एकाने दिली. तिच्या कवितेतल्या लैंगिकतेची हिंस्र टवाळी करत कैक पुरुष वाचकांनी आपली पुरुषी वृत्ती दाखवून दिली. या प्रतिक्रियांचे स्क्रीन शॉट्स आमच्याकडे आहेत. सुदैवाने असे नमुने मोजकेच होते. दुसऱ्या बाजूने मोठ्या संख्येने वाचकांनी योग्य विचार व चांगल्या भावना मांडणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेकांनी उत्स्फूर्त अनुवाद केले. कविता मोठ्या प्रमाणात शेअर केल्या गेल्या. ही लोकप्रियताही अनेकांना खुपली आणि त्यातून पुन्हा ‘कवीचं मूळ’ शोधण्याचे उद्योग सुरू झाले. कवयित्रींना आपली ओळख लपवावी का वाटली वा टोपणनावाने का लिहावं वाटलं, याच्या अनेक उत्तरांपैकी एक उत्तर या प्रतिक्रियांमध्ये उघडंनागडं झालेलं दिसतं.
कवीची ‘ओळख’ कवितेच्या अभ्यासासाठी हवी असण्यास हरकत नसते. मात्र हा चरित्रपर समीक्षेचा विभागच आपल्याकडे नीट परिचित नाही; मग त्या विभागाचा विकास होणं ही तर फार दूरची गोष्ट आहे. त्यामुळे वाचकांना ही ओळख हवी असते ती केवळ पोकळ कुतूहल पूर्ण करण्यासाठी. जोवर असे अभ्यास व्यवस्थित सुरू होत नाहीत, तोवर या ओळखी अदृश्य राहिलेल्याच बऱ्या.
एक वस्तुस्थिती अशी असते की, मुलींची जन्मावेळी ठेवलेली गेलेली वा जन्मदाखल्यावर, शाळेत नोंदवली गेलेली जी नावं असतात, ती अगदी अपवादानेच मरेपर्यंत कायम राहतात. एका प्रकारातल्या स्त्रियांची नावं लग्नानंतर बदलली जातात आणि दुसऱ्या प्रकारातल्या स्त्रियांना कुटुंबाची अप्रतिष्ठा होईल या दडपणाखाली ती बदलावी लागतात. ज्या वेश्यांना सतत या शहरातून त्या शहरात फेकलं जातं, त्या फ्लाइंग क्वीन्सची नावंही शहरानुसार बदलतात. अशा स्थितीत कवयित्रीचं नाव हा मुद्दा फारच हास्यास्पद ठरू शकतो. काहींना आपली दैनंदिन जगण्यातली ओळख आणि लेखिका / कवयित्री म्हणून असलेली ओळख जाणीवपूर्वक वेगळी ठेवायची असल्याने, त्या टोपणनाव स्वीकारून लिहितात. आहे हे असं आहे.
००
काही मुद्दे मी ‘विचारा’साठी काढले आहेत. अनुभवांच्या पातळ्या आणि कवितेचा दर्जा याबाबत विचार करण्याचा प्रयत्न करते आहे; तो असा –
- कवयित्रीचा अनुभव स्वत:चा आहे का?
- अनुभव अगदी नजीकच्या / घरातल्या / गोतावळ्यातल्या / गावा-प्रांतातल्या / जाती-धर्मातल्या / समान लिंगाच्या / समभाषी व्यक्तीचा आहे का? घडलेल्या घटना स्वत: डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत का? किंवा संबंधित व्यक्तीने स्वत: सांगितलेल्या आहेत का? असे असेल तर तो अनुभव दुसऱ्या पातळीवरचा / दर्जाचा ठरतो.
- अनुभवाची तिसरी पातळी अजून दूरस्थ बनते. यात ऐकलेल्या कहाण्या – गॉसिप – दंतकथा – हकीकती येतात; वाचलेली पुस्तकं, मासिकं, वृत्तपत्रं येतात; पाहिलेली चित्रं, छायाचित्रं, चित्रपट येतात.
- चौथी पातळी ‘काल्पनिक’ असण्याची. तसं अनेकदा लेखक जाहीर करतात; कवींनी अद्याप असे खुलासे पुस्तकात केलेले दिसले नाहीत, ही आशादायी गोष्ट आहे. पुस्तकात जे काही घडलं होतं, घडतं आहे असं लिहिलेलं असतं ते पृथ्वीवर कुठेतरी प्रत्यक्षात – वास्तवात घडलं आहे की फक्त लेखक-कवीच्या मनात घडलं आहे? मनातच घडलेल्या गोष्टी ही अनुभवाची चौथी पातळी.
पहिल्या पातळीवरचं लेखन आपल्याकडे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. दुसऱ्या पातळीवर महत्ता कमी होते, पण कौतुक पुष्कळ शिल्लक असतं. तिसऱ्या पातळीवरचे अनुभव आहेत असं समजलं तर वाचकांच्या मनातली लेखनाविषयीची विश्वासार्हता व सत्यतेबाबतची खात्रीची कल्पना उणावते. आणि चौथ्या पातळीवरचं लेखन सरळ ‘बाल’साहित्याच्या विभागात नेऊन फेकलं जातं.
विश्वासार्हता व सत्य मात्र हे दोन्ही चांगल्या कवितेसाठी आवश्यक घटक आहेत का? – असा एक प्रश्न त्यातून निर्माण होतो.
सत्य एक नसते, सत्यं अनेक असतात. कोणतेही लेखन शंभर टक्के वास्तवदर्शी / सत्य वा शंभर टक्के काल्पनिक / खोटं असूच शकत नाही; मग ती बातमी असो वा कविता.
– हे बहुसंख्य वाचकांच्या ध्यानात का येत नाही?
साहित्य वाचताना त्यात आपल्याला सगळं सत्य, सगळं वास्तव, सगळं खरं नेमकं कशासाठी हवं असतं? कल्पना, स्वप्नं, भ्रम, भास, चमत्कार यांना जीवनात खूप स्थान असलं तरी साहित्यात ते नको वा असल्यास तसं साहित्य दुय्यम असं का वाटतं? आत्मचरित्र हमखास खोटारडं आणि कादंबरी हमखास खरी असं समजण्याचा विरोधाभास आपल्यात नेमका का विकसित झाला आहे? लेखनातून, अगदी कवितेतूनही निखळ वास्तवाची अपेक्षा करणं कशातून आलं असेल? मीडियाने विश्वासार्हता गमावली आहे, इंटरनेटवरून माहितीचे लोंढे येत असले तरी ती अधिकृत म्हणवत नाही; अशा स्थितीत ‘फक्त पुस्तकं’ निश्चित सत्य सांगतील आणि योग्य माहिती देतील – असं लोकांना वाटतं आहे का? सत्य सांगणं, वास्तव दाखवणं व माहिती देणं याहून वेगळं काम कविता करत असते – याची जाणीव आजच्या बहुतांश मराठी वाचकांना नाही, असं ढोबळमानाने म्हणता येईल का? – अशा प्रश्नांची उत्तरं मी या कवितांच्या निमित्ताने शोधण्याचा प्रयत्न करते आहे.
कवितेची भाषा, अनुवादाचा दर्जा आणि कवयित्रींचा बायोडाटा हे तीन मुद्दे पूर्णपणे बाजूला ठेवून निखळपणे केवळ कवितेचा विचार इथं व्हावा, अशी अपेक्षा आहे.
०००